राजूची कविता
शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळेजण आपापल्या मार्गांनी गेले. शौनक अमेरिकेला, सुनिता लग्न होऊन दुसऱ्या गावी गायनॅकची प्रॅक्टिस करायला, संजय मुंबईला. मी आणि राजू मात्र पुण्यात होतो, त्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या भेटी गाठी जास्त शिवाय, माझ्या घरासमोर तिचा मामा पण राहायचा. बरेच वेळा तर ती आमच्याकडे येऊन जायची, जेवायची पण आणि मला पत्ताच नसायचा कधीतरी दोन-तीन दिवसांनी अप्पा म्हणजे माझे वडील राजू येऊन गेल्याचे ओघाओघात सांगायचे.
अशी ही राजू आणि तिच्याच हस्ताक्षरातील तिची ही कविता (साधारण १९७७-७८ मध्ये लिहिलेली)
रंगून भंगलेल्या स्वप्नात आज दंग
जळण्यात जागलेल्या श्वासात हाच छंद
राखेतली स्मृती ही अजुनी प्रसन्न आहे
घायाळ प्रीत माझी अजूनही जिवंत आहे
रंगुनिया वसंती शरदात नाहलेली
गीतात माळली मी कुसुमे तुझ्याचसाठी
त्या वाळल्या फुलांना अजुनी सुगंध आहे
घायाळ प्रीत माझी अजूनी जिवंत आहे
मला आजही तिच्या ह्या कवितेबद्दल काही म्हणजे काही आठवत नाही. तिने ही कुठल्या मनस्थितीत लिहिली, केव्हा लिहिली वगैरे. जरी आम्हा सर्वांना एकमेकांची गुपिते ब-यापैकी माहित असली तरी ही कविता कुणाला उद्देशून लिहिली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.
राजू एक चांगली डॉक्टर तर होतीच पण उत्तम कवयित्री / लेखिका आणि चित्रकार पण होती. तिने शौनकला अमेरिकेला जाताना एक ऑईल कलरचे पेंटिंग पण भेट दिले होते.
राजू आता नाही, गेली ती खूप वर्षांपूर्वी एका असाध्य रोगाने. पण ही कविता माझ्याकडे तिची कायमची आठवण राहील.
No comments:
Post a Comment