वेब व्हर्जन

मोबाईल व्हर्जन पेक्षा वेब व्हर्जन मध्ये जास्त छान दिसते.

Thursday, 28 October 2021

दुसरे दशक

 

दुसरे दशक

 

सिंहावलोकन, किती छान शब्द आहे!  आयुष्याच्या सहाव्या दशकात आल्यावर बरेच पाठीमागे गेलेले दुसरे दशक वळून बघायचं म्हणजे एकदम वेगळेच वाटते.  माझा जन्म १९५५  सालामधला. पहिल्या पाच वर्षाच्या आयुष्यात आपण काय होतो ते आठवत नाही.  १९६० साली भावे प्राथमिक शाळेत गेलो तो पहिला माझा सार्वजनिक वावर. त्यानंतर १९६१ ते १९७०१९७१  ते १९८०, १९८१ ते १९९०वगैरे वगैरे, अशी पाहता पाहता  सहा दशके गेली. त्यातलं सर्वात संस्मरणीय दशक म्हणजे १९७१ ते १९८०  म्हणजे वय वर्षे १५ ते वय वर्ष २५!

 

आपण कोण होणार याची शाश्वती नसताना मोठी मोठी स्वप्ने बघण्याचा तो  काळ.  महत्त्वाकांक्षा, संधी आणि कार्यक्षमता यांचा एकमेकांशी काही संबंध असतो याची आपल्याला  कल्पनाच नसते. डोक्यात फक्त असते ती फक्त महत्त्वाकांक्षा. आपल्याला एखादी गोष्ट जमेल की नाही त्याचा हिशोबच  नसतो. माझं पण असंच झालं. शाळेतल्या हवाईदलाच्या एनसीसीत असल्यापासून हवाईदलामध्ये जायचं हे मी मनोमन नक्की केलं होतं; पण त्यासाठी काय करावं लागतं. काय नाही काही माहिती नव्हतं. घरामध्ये आईला असं वाटत होतं   की सैन्यात जायचं  म्हणजे  फक्त मरायला! वडील डिफेन्स अकाउंटस मध्ये होते तरी त्यांचे असे  काहीच मत नव्हतं; मोठ्या भावाला वाटायचं मी त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हाव आणि त्याच्यासारखंच भाभा अणुशक्ती केंद्रात किंवा तत्सम सरकारी  प्रयोगशाळेत चिकटून जाव. एकंदरीत काय मी सैन्यात जाण्यासाठी घरून काहीच प्रेरणा नव्हती. त्यामुळे काय झालं की आपला देश एका भविष्यकालीन एअर चीफ मार्शलला मुकला! 

 

अर्थात त्याचे इतरही परिणाम झाले मुख्य म्हणजे इंटरला अपेक्षित मार्क मिळाले नाहीत त्यामुळे पुण्याच्या ऐवजी गोव्यातील फार्मागुडी  येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता; पण वडीलांची निवृत्ती पुढच्याच वर्षी होती.  त्यामुळे ते म्हणाले की जे काय दिवे


लावायचे ते पुण्यातच लावा.  मग शांतपणे गरवारे महाविद्यालयात द्वितीय वर्ष शास्त्र शाखेला प्रवेश घेतला आणि भौतिकी विज्ञान, रसायन शास्त्र आणि गणित असे तीन विषय घेतले. पुढच्या वर्षी म्हणजे शेवटच्या वर्षी गणित नको वाटल, रसायनशास्त्राची घाण वाटायची म्हणून  भौतिकी विज्ञान घेतले आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात पदवीधर झालो. पण डोक्यातले हवाईदलाचे खूळ गेले नव्हते. त्यामुळे डायरेक्ट एन्ट्री ह्या हवाईदलाच्या योजनेनुसार वाराणशीला जाऊन एकदा जनरल ड्युटी पदासाठी तर  एकदा वैमानिकासाठी परीक्षा दिली. घरच्या अप्रेरणादायी वातावरणामुळे जे व्हायचे तेच झाले. तिसऱ्यांदा म्हैसूरला वायुदलात हवामान शास्त्रज्ञ म्हणून मुलाखतीसाठी बोलावले होते; पण पुण्यातील हवाईदल निवृत्त विंग कमांडर देशपांडे यांनी जाऊ नको असा सल्ला दिला म्हणून मुलाखतीला सुद्धा गेलो नाही.

 


आता एकच मार्ग राहिला म्हणजे भौतिकी विज्ञानात पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी म्हणजे एमएससी करणे. त्याप्रमाणे दोन वर्षात भौतिकीविज्ञनात आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स हा विशेष विषय घेऊन एमएससी झालो. सरकारी नोकरीचे खूप प्रयत्न केले, पण नशीबात नव्हते. शेवटी भावाच्या ओळखीने पुण्यात  चित्रशाळेपाशी असलेल्या एका लघु इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात  अडीच वर्षे पाट्या टाकल्या; खूप अनुभव मिळाला. अगदी सर्किट डिझाईन पासून ते मेंटेनन्स पर्यंत. साखर उद्योगाला लागणारे इलेक्ट्रॉनिक मशीन हा माणूस बनवत असे. त्यामुळे त्याने मला गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू,   कर्नाटक अशा सगळ्या राज्यांत - जेथे जेथे साखर कारखाना असेल  तेथे तेथे - अशा सुमारे २५० साखर कारखान्यात फिरवले. त्यावेळी रेल्वेत आरक्षणाची पद्धत फारशी नव्हती; शिवाय सर्व साखर कारखाने आत कुठेतरी खेडेगावात, रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच, एसटी चा भीषण प्रवास, त्यामुळे त्या अडीच वर्षात मी अगदी थकून गेलो.

 


तोपर्यंत १९७९ साल आले होते.आणि मग नशीब पालटायला सुरुवात झाली मुंबईच्या प्रख्यात जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रथमच इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर भरती करायचा ठरवला आणि मी त्याला पात्र ठरलो. मी त्यांच्याकडून कबूल करून घेतलं होतं की एक वर्षाच्या प्रोबेशन नंतर ते मला दिल्लीच्या आय आय टी मध्ये बायोमेडिकल इंजीनियरिंग एमटेक कोर्सला त्यांच्या खर्चाने पाठवतील. त्याबदल्यात मी एमटेक झाल्यावर जसलोकमध्ये पाच वर्ष नोकरी करायची. पण आपण ठरवतो एक आणि होतं एक. दहा महिने झाल्यावर अचानक मुंबईचाकामगारनेता" डॉ दत्ता सामंत याच्या नेतृत्वांने जसलोक हॉस्पिटलमध्ये साडेतीन महिन्याचा संप झाला. मेडिकल, पॅरामेडिकल आणि टेक्निकल म्हणजे मी असं स्टाफ संपामध्ये सहभागी नव्हते. मुख्यतः क्लास तीन आणि चार हे सहभागी होते. पण त्यांनी आम्हाला सर्वांना धमकी दिली की, तुम्ही आत जाऊनच बघा की तुमचं  तंगड तोडतो.  आणि आमच्या एका पॅथॉलॉजी आणि एक्स-रे ऑफिसरच्या बद्दल त्याने ते करून दाखवल. आमची पॅथॉलॉजी ऑफिसर पद्मा अय्यर ही नंतर १९८४ पर्यंत कोमातच होती असं मी ऐकलं, पुढं काय झालं मला माहिती नाही.

 

याचा परिणाम असा झाला  की जसलोकची छान नोकरी  आणि दिल्ली आयआयटीमध्ये एमटेक करायचं स्वप्न हे दोन्ही बोम्बलल.  हातात पैसे नाहीत त्यामुळे मुंबईत राहणार कसं? पुण्याला परतलो.   तो काळ असा होता की भारतामध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची सुरुवात होती. काही ठराविकच मोठे उद्योग धंदे होते की ज्याच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भरती व्हायचे. अर्थात महाराष्ट्रातल्या पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि पाच विद्यापीठे यातून फक्त दोनशे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बाहेर पडायचे पण त्यांनाही नोकरी मिळायची नाही.  माझं सुदैव एवढं की १९७९ च्या  डिसेंबरमध्ये ओळखीने मला मुंबईच्या  एका डेन्मार्क स्थित (डॅनिश) कंपनीत नोकरी लागली आणि माझी गाडी परत रुळावर आली. नंतर कदाचित माझ्या कामामुळे असेल पण त्यांनी पुण्याला एक शाखा काढायची ठरवली आणि मी मुंबईच्या पगारावरच परत पुण्यात आलो. इलेक्ट्रॉनिक्स  मधील तांत्रिक भाग म्हणजे डिझाईन, प्रोडक्शन, इंस्टॉलेशन व  कमिशनिंग कधीच मागे पडले होते  आणि आता मी डॅनिश कंपनीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स प्री सेल्स, मार्केटिंग, प्रमोशन, वगैरे वगैरे यामध्ये कारकीर्द करायची ठरवली.

 

लवकरच माझ्या लक्षात आलं मी जरी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या विक्री व्यवसायात  असलो  तरी मार्केटिंग मॅनेजमेंटची कुठलीही डिग्री किंवा शिक्षण माझ्याकडे नाही. म्हणून मी पुणे विद्यापीठाचे संध्याकाळचे डीबीएम-एम एम एस मध्ये प्रवेश घेतला; अर्थात तोपर्यंत पुढचे दशक उगवले होते

 

 १९७१ ते १९८०  हा प्रवास अतिशय थरारक असा झाला. आपण योजायचे एक आणि व्हायचे भलतेच! या काळामध्ये झालेल्या अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायला हवा. १९६० पासून ते १९७१ पर्यंत आम्ही केवळ मुलांच्या शाळेत होतो. मुलींचा जवळ-जवळ संपर्कच नाही. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा जवळ जवळ एक तपाने  मोठी असल्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्याताई”  होत्या! या पार्श्वभूमीवर गरवारे महाविद्यालयात भेटलेल्या राजू, सुनितासारख्या सुंदर मैत्रिणींनी ते दिवस अतिशय सुंदर केले. नंतर पुणे विद्यापीठात तर सहशिक्षण होते पण तिथे चांगल्या अशा मैत्रिणी झाल्या नाहीत. कंपनीमध्ये मात्र खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. जसलोक मध्ये मंगल मुळे, सिस्टर आयरिन डिसिल्व्हाडॅनिश कंपनीत  विशेषतः टीना मोतीवालाबेलींडा मेंझिस, फातिमा फर्नांडिसपुष्पा सलढाणाया मुलींनी माझ्यात पूर्वी कधीही नव्हता एव्हढा आत्मविश्वास निर्माण केला. सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंटला लागणारा सभाधीटपणा, पब्लिक स्पिकिंग आणि भिन्नलिंगी व भिन्न संस्कृती मधल्या सहकाऱ्यांशी कसं बोलावं व वागाव याचं शिक्षण त्यांनी मला दिलं आणि त्यामुळेच पुढच्या काही दशकात मी माझ्या कार्यक्षमतेत वाढ करू शकलो आणि विभिन्न संस्कृतीच्या सहका-यांचे नेतृत्व करून  यशस्वी होऊ शकलो.

 

या दशकात माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होतील अशा अजून तीन घटना घडल्या - एक म्हणजे मी गरवारे महाविद्यालयात सायन्स असोसिएशन आणि फिजिक्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झालो. तसेच महाविद्यालयाच्या शेवटच्या दोन वर्षात गरवारे कॉलेजच्या तालमीत (त्यावेळी तालमीला जिम म्हणत नसत) आणि टिळक टँक वर सकाळ संध्याकाळ पडिक असे. त्यामुळे तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि त्यावेळी मिळालेली शक्ती अजूनही पुरते आहे.  अजून एक गोष्ट अशी की कदाचित आपले मराठीचे मास्तर तीर्थरूप श्री वा कुलकर्णी यांचा प्रभाव म्हणा, मी गोष्टी आणि कविता लिहायला लागलो. प्रत्येक वर्षाच्या वार्षिक अंकात माझी काहीतरी कथा किंवा कविता असायचीच. गरवारे महाविद्यालयात असताना कला शाखेच्या तीन विद्यार्थांच्या बरोबर मिळून मीदूतनावाचे त्रैमासिक आणिपिपाणीनावाचे भिंतीवरचे हस्तलिखित-अनियतकालिक संपादन करून प्रकाशित करत असे. (पिपाणी च्या संपादकाला "पिम्पाद्क" म्हणत!) पण महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील ते फुलपंखी दिवस संपले आणि  कलालेखन सुद्धा.  

 

तर असं हे दशक माझ्या व्यक्तिमत्त्वावर सर्वांगाने परिणाम करणारे! १९७१ ला शाळेतून पांढरा हाफ शर्ट खाकी हाफ चड्डीवर बाहेर पडलेला मी आणि १९८० ला डॅनिश कंपनीत सुटाबुट-टायमध्ये असलेला मी हे दोन्ही वेगळे होतो!

 


Tuesday, 26 October 2021

माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०.


माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०
.
भवताला बरोबर तुमच्यावर लहान वयात परिणाम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शाळा. ती गोष्ट नव्हेच, एक व्यक्तीच असते. दुस-या-तिस-या वर्षी कळायला लागल तेव्हापासून मनावर ठसली ती माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०. आम्ही शाळेच्या पश्चिम भिंतीच्या कडील बोळात राहायचो. बरोब्बर बोळाच्या मध्यावर. त्यावेळी त्या बोळाला टिळकवाडी म्हणायचे - बाजूच्या टिळकरस्त्याची एक गल्ली म्हणून.

शाळा दोन सत्रात भरायची - सकाळ व दुपार. सकळी सव्वासात ते साडे अकरा आणि दुपारी बारा ते साडेपाच. दोन्ही सत्रात दोन मधल्या सुट्ट्या, एक छोटी १० मिनिटांची व एक मोठी २० मिनिटांची. ४५ मिनिटांचा एक तास. हे सगळ इतक्या तपशिलात सांगायचे कारण की शाळेची घंटा सुरुवातीला, तास संपताना, सुट्टी होताना, संपताना व्हायची. म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घंटा वाजत रहायची आणि त्यानुसार आमची दिनचर्या पण.


८ मार्च २०२१ ला शाळेतून ११ वी एस.एस.सी. करून बाहेर पडल्याला बरोबर ५० वर्षे झाली! परीक्षा संपल्याचा तो दिवस अजून आठवतोय. नुकतीच सगळ्यांना मिसरूड फुटलेली, आणि शिंग ही! आता कोण कुठे जाणार आयुष्यामध्ये कुणास ठाऊक! अर्थात काही हुशार निर्धारी विद्यार्थी होतेच की ज्यांनी त्यांनी ठरवल तेच मिळवलं.

आज ५० वर्षांनी मागे वळून पाहताना किती लांब आलो ते बघून छाती दडपून जाते. पण शाळेची ओढ अजून तशीच आहे. कधीही शाळेचे छायाचित्र दिसले की भारावून जायला होत. ५ वी ते ११ वी - आयुष्यातील मोलाची, नकळत झालेल्या जडणघडणीच्या वर्षाचं गारुड मनात घोंघावत, पापण्या जड होतात, डोळे पाणावतात.

आपला गाजलेला खोखो पटू मित्र हेमंत उर्फ बंडू जोगदेव मात्र आपल्या मुलामुलींच्या शाळेशी खोखो प्रशिक्षक म्हणून अजूनही संबंध ठेऊन आहे. बंडू परवा नेमका ८ मार्चच्या सुमारासच शाळेत गेला होता व त्याने खाली दिलेले ३ व्हिडीओ शूट केले आहेत. तुम्ही बघा, जुन्या आठवणी पण ताज्या होतील. धन्यवाद बंडू.




 


Monday, 25 October 2021

राजूची कविता

 राजूची कविता



गरवारे कॉलेजमध्ये कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात आम्ही झालेले ५ मित्र-मैत्रिणी - दोन मुली आणि तीन मुलं. आमच्यापैकी नंतर दोन इंजिनियरिंगला, दोन मेडिकलला आणि मी सायन्सला गेलो. वाटा वेगळ्या झाल्या पण खूप वर्ष एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यातला मी सर्वांच्या जास्त संपर्कात होतो.  राजू आमची एक सुंदर मैत्रीण, एका संपन्न घरातील. तिचे कागदोपत्री नाव शुभदा होते, पण तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला कधी शुभदा हाक मारल्याचे मी ऐकले नाही राजू. फक्त माझी मैत्रीण नव्हती तर ती माझ्या आई-वडीलांची पण मैत्रीण होती आणि पुढे माझं लग्न झाल्यावर ती माझ्या बायकोची पण मैत्रीण झाली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळेजण आपापल्या मार्गांनी गेले.  शौनक अमेरिकेला, सुनिता लग्न होऊन दुसऱ्या गावी गायनॅकची प्रॅक्टिस करायला, संजय मुंबईला. मी आणि राजू मात्र पुण्यात होतो, त्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या भेटी गाठी जास्त शिवाय, माझ्या घरासमोर तिचा मामा  पण राहायचा. बरेच वेळा तर ती आमच्याकडे येऊन जायची, जेवायची पण आणि मला पत्ताच  नसायचा कधीतरी दोन-तीन दिवसांनी अप्पा म्हणजे माझे वडील राजू येऊन गेल्याचे  ओघाओघात सांगायचे.


अशी ही राजू आणि तिच्याच हस्ताक्षरातील तिची ही कविता (साधारण १९७७-७८ मध्ये लिहिलेली)


 रंगून भंगलेल्या स्वप्नात आज दंग

 जळण्यात जागलेल्या  श्वासात हाच छंद

 राखेतली स्मृती ही अजुनी प्रसन्न आहे

 घायाळ प्रीत माझी अजूनही जिवंत आहे


 रंगुनिया वसंती शरदात नाहलेली

 गीतात  माळली मी कुसुमे तुझ्याचसाठी

 त्या वाळल्या फुलांना अजुनी सुगंध आहे

 घायाळ प्रीत माझी अजूनी जिवंत आहे



मला आजही तिच्या ह्या कवितेबद्दल काही म्हणजे काही आठवत नाही. तिने ही कुठल्या मनस्थितीत लिहिली, केव्हा लिहिली वगैरे. जरी आम्हा सर्वांना एकमेकांची गुपिते ब-यापैकी माहित असली तरी ही कविता कुणाला उद्देशून लिहिली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.

राजू एक चांगली डॉक्टर तर होतीच पण उत्तम कवयित्री / लेखिका  आणि चित्रकार पण  होती. तिने शौनकला अमेरिकेला जाताना एक ऑईल कलरचे पेंटिंग पण भेट दिले होते.


राजू आता नाही, गेली ती खूप वर्षांपूर्वी एका असाध्य रोगाने. पण ही कविता माझ्याकडे तिची कायमची आठवण राहील.





Thursday, 21 October 2021

दिवसेंदिवस

महाविद्यालयात असताना आणि नंतरही काही दिवस मी कविता करत असे.  कवितांची ही डायरी मला जवळजवळ चाळीस वर्षांनी  अचानकच सापडली.  त्यातली ही एक शेवटची कविता. १९७९ साली लिहलेली. ह्या कवितेची पार्श्वभूमी अशी की मी मुंबईला नोकरीला लागलो होतो. भावाकडं डोंबिवलीला राहात असे. सकाळी सात वाजता निघालं घरून की संध्याकाळी घरी यायला  साडेसात वाजत.  निघताना पण  मी पेंगुळलेला असे आणि येताना पण. मला आश्चर्य वाटायचं ही मुंबईची माणसं कशी काय जगतात,  एवढ्या अवघड परिस्थितीत?  एक प्रकारचं नैराश्य कायम भोवताली असायचं; त्यातूनच ही कविता  स्फूरली असावी::

दिवसेंदिवस




 उगवतीचा आणि मावळतीचा सुद्धा,

 सूर्य मी कधीच बघत नाही.

 माझ्या सोबतीला असतो तो भर

 माध्यान्हीचा सूर्य. स्वतःच्या अस्तित्वाची

 प्रकर्षाने जाणीव करून देणारा.


 झोपलेल्या सूर्याच्या अगोदर मी

 चालू लागतो,  पेंगुळलेली पहाटेची

 स्वप्न दाराआड ठेवून थेट.

 इकडं तिकडं न बघता.


 आणि संध्याकाळच्या रंगांची धमाल

 संपल्यावर मी येतो.

 खाडीवरच्या  मासेमारी   होडयांचे

 दिसेनासे होणारे दिवे  पहात  व

 धुंद(?)  खारा वारा अंगावर  घेत..

 घरी ठेवलेली ती पहाटेची स्वप्ने

 येऊ पाहतात डोळ्यांवर.


 तुझीही आठवण  होते.

 गालांवरचा  तांबडा जल्लोष  आणि

 मग अनुक्रमे येणाऱ्या आठवणी

 मांडणीवरच्या जुन्या भांड्यांवरील

 नावाप्रमाणे दिवसागणिक  अंधुक होत जातात.

 निदान तस वाटत तरी.

 पण ती चकचकणारी भांडी मनात

 शाबूत असतात. अगदी काळ निरपेक्ष.


 मी निघतो. पुन्हा एकदा ती  पहाटेची

 भन्नाट स्वप्न दाराआड करुन.

 फक्त माध्यान्हीचा सूर्य बघण्यासाठी.


  • जयंत पानसे 

    • १ मे १९७९ 

Thursday, 14 October 2021

माझा सिगारेट प्रवास

 

माझा  सिगारेट प्रवास


माध्यमिक शाळेतून बाहेर पडलं की खूप क्षितिजे खुणावत असतात. पंधरा सोळा वर्षांच वय आणि त्यातून तुम्ही जर फक्त मुलांच्या शाळेत असाल तर मग मुलींच्या बरोबरच्या  सहशिक्षणाची गंमत वेगळीच.  आमच असंच  झालं.  पुरुषार्थ दाखवण्याच्या विविध हिकमती त्यावेळेला  सर्वच मित्र दाखवायचे, त्यातले एक  म्हणजे दाढी मिशी.  माझ्या आठवणी प्रमाणे शाळेमध्ये फक्त मी आणि श्रीनिवास पुंडले अशा दोघांनाच शाळा सोडायच्या आधी भरपूर दाढी आणि मिशी आली होती. मला तर मित्र अस्वल्या म्हणायचे. त्यामुळे मी जरा वयाच्या मानाने थोराड दिसायचो. त्यातून तेव्हा सैन्यात जायचे वेड  लागले होते त्यामुळे तालमीत जाणे वगैरे उद्योगही करत असे.  -याच नातेवाईकांना असे वाटे की मी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात नसून दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात असेन.

 

२२ जानेवारी १९७२  रोजी माझ्या भावाचं लग्न झालं. आमच्या वहिनी इंदूरच्या. त्यावेळी पुणे-इंदूर अशी कुठलीच आगगाडी नव्हती आणि बस पण नव्हती. जाताना आम्ही खांडव्यापर्यंत आगगाडीने गेलो आणि तिथून मग बसने. येताना मात्र इंदूर-नाशिक या एसटीने आलो. पुण्यापर्यंत थेट एसटी नव्हती. सकाळी इंदूरला बसलो, संध्याकाळी साडेसहा वाजता नाशिकला पोहोचलो. पुण्याची गाडी रात्री नऊ वाजता होती. तेव्हा असं ठरलं की  थोडा टाईमपास करावा, वाटल तर जेवण करावं आणि मग पुढच्या गाडीत बसाव. 

 



लग्नाचे परतीचे  -हाड,  त्यामुळे सामान भरपूर. त्यावेळच्या नाशिकच्या बस स्टँड वर अगदी किरकोळ दिवे होते. मग ठरलं की आळीपाळीने जेवून यायचं;  म्हणजे काहीजणांनी सामानाबरोबर थांबायचं. बायका-मुलांचे जेवण झालं की मग पुरुषांनी जेवायला जायचं. त्याप्रमाणे आम्ही जेवून घेतलं. जेवण झाल्यावर भावाचा मित्र बब्बड खिरे म्हणाला चल जरा बाहेर जाऊ. त्यांच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ  नंदू  आणि भावाचा दुसरा मित्र कुलकर्णी असे होते.  सदाशिव पेठेच्या हौदाशेजारील आपल्या अतुल कारखानीसच्या वाड्यात शेजारी राहायचा बब्बड. मला वाटतं बंडू निघोजकर पण त्याच वाडयतला.  मला कळेना की बाहेर  कशाला जायचं  मग नंतर कळलं की सिगरेट फुंकण्याचा कार्यक्रम होता. त्यांच्याकडं मेन्थाॅलची नॉर्थ पोल नावाची एक सिगारेट होती. त्याने मस्त सिगारेट पेटवली, शिलगावली आणि मलापण देऊ केली. मी ओशाळत नाही म्हणालो. तो म्हणाला, हे काय कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात आहेस आणि अजून शिकलाच नाहीस सिगारेट ओढायला? थापा मारतोयस! आणि तू घेच. मी  हे दिन्याला सांगणार नाही. दिनेश म्हणजे माझा मोठा भाऊ. तो ओढायचा सिगारेट, पण मला त्यांने कधी दिली नव्हती.  शेवटी हो ना करता करता मी सिगारेट घेतली! तर अशी ती माझी पहिली सिगारेट कॉलेजच्या पहिल्या वर्षात ओढलेली.

 

त्यानंतर जवळ जवळ पुढची पाच सहा वर्ष मी सिगारेट फारशी ओढत नसे. माझा भाऊ आणि मेव्हणे हे एकच ब्रँड ओढायचे - ब्रिस्टॉल आणि ते आले घरी हळूच मला म्हणायचे की कोपऱ्यावर जाऊन येऊ आणि मग तिथे जाऊन  सिगारेट ओढायची; त्यावर एक मसाला पान खायचं आणि मग घरी यायचं. अशा रीतीने एम. एस्सी. होईपर्यंत रुटीन चालू होत. विद्यापीठात भौतिक शास्त्र विभागात एम. एस्सीला शिकवायला डॉ. पद्माकर पानट सर होते, त्यांचा ब्रँडही  ब्रिस्टॉलच! कधी कधी सर मूड मध्ये असतील तर मिळायची एखादी सिगारेट. तोपर्यंत असे काही समव्यसनी मित्र पण लाभले. पण पैसे कुणाकडेच नसायचे, असेच कुठेतरी मिळालेले पाच पैसे - दहा पैसे जमा करून एक ब्रिस्टॉल पाच पैशाला आणि एक चहा दहा पैशाला असा आठवड्यातून एकदा काहीतरी सामुदायिक कार्यक्रम चालायचा.  फारच  तलफ आली तर पाच  पैशाला  तीन  विडया घ्यायच्या;  मग  रात्री अभ्यासाच्या नावाखाली गरवारे महाविद्यालयात उशीरापर्यंत बसून  मुतारीच्या आडोशाला त्या विड्या ओढायच्या.  गरवारे महाविद्यालयात मुतारीला पार्लमेंट म्हणायचे  कारण ते गोल होते.

 

मग नोकरीला लागलो आणि पहिल्याच नोकरीत इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग करण्यासाठी भारतभर - विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू  व गुजरातला जावे लागले.  दिवसेंदिवस  अनोळखी ठिकाणी आगगाडीचा - एसटीचा प्रवास, शिवाय हातात प्रवासासाठी दिलेला पगाराव्यतिरिक्त असलेला प्रवास भत्ता! मग काय, त्यामुळे भरपूर व मनसोक्त सिगारेटी फुंकणे हा एकच कलमी कार्यक्रम झाला होता.

 

पाहता पाहता मी नोकरीमध्ये स्थिरावलो आणि सिगारेटचे व्यसन सुद्धा. माझ्या आईने आमच्या फॅमिली डॉक्टरला एकदा सांगून पण बघितले की याचे हे व्यसन सोडवा. फॅमिली डॉक्टर श्रीकांत करंदीकर मोदी गणपती जवळचा एकदम भारीच, तो म्हणाला मला जोपर्यंत  कुठला त्रास होत नाही  तोपर्यंत ओढू दे  सिगारेट, तुम्ही काळजी करू नका! डॉक्टर करंदीकर हे  सैन्यातून निवृत्त झाले होते; त्यामुळे त्यांना एकदम परफेक्ट अंदाज होता की कुणाला काय झेपेल आणि काय नाही.  असो.

 

 अशा रीतीने २४ वर्ष कार्पोरेट कंपन्यांमध्ये काढून  मी कारकीर्दीचा  सांधा बदलला  आणि शैक्षणिक क्षेत्रात आलो.  शिक्षक म्हणजे गुणांचा पुतळा! त्यामुळे विद्यार्थ्यांचे समोर तरी सिगारेट ओढायची नाही असा एक दंडक होता. तरी नशिबाने मी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा शिक्षक होतो त्यामुळे त्यातल्या त्यात बरे. मी पत्रकार नगर च्या पुढच्या विखे पाटील कॉलेजमध्ये असताना सहकाऱ्यांचे बरोबर तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जायचो आणि तिथे सिगरेट ओढायचो व तेथल्या विटांच्या ढिगात थोटके टाकायची.  आम्ही गमतीने म्हणायचो कि येथे उत्खनन झाले काही वर्षांनी तर हा थोटकांचा ढीग बघून काय निष्कर्ष काढतील काही सांगता येत नाही. शैक्षणिक क्षेत्रात काही वर्षांनी एका व्यवस्थापन महाविद्यालयाचा संचालक झाल्यावर तर धुम्रपानाचे फारच वांधे झाले!

 

अशा रीतीने पाहता पाहता माझ्या धूम्रपानाला १९७२ नंतर २०२० पर्यंत ४८ वर्षे झाली. तेव्हढ्यात करोनाची साथ आली, लॉकडाऊन झाला व दुकान बंद पडल्यामुळे सिगारेट मिळण्याची पंचाईत  झाली. उरलेली थोटके  ओढून ओढून  फिल्टरपर्यंत संपली. माझ्या शेजार राहणारे गॅरेज-मालक सिगारेट कुठून कुठून आणायचे आणि मग आम्ही अर्धी-अर्धी ओढायचो. 

 

पण हा करोनाचा काळ फार अवघड गेला. सिगारेट ओढण्याचे,  न ओढण्याचे  उपवास  फार झाले. त्यातून माझे या विषयातले दोन गुरु म्हणजे माझा मोठा भाऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीचे  यजमान - मेव्हणे हे दोघेही करोनाने बाधित होऊन पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला बळी पडले. डॉ. पद्माकर पानट सर तर दोन वर्षांपूर्वीच वारले होते. काही महिन्यांपूर्वी डॉ. श्रीकांत करंदीकरही वारले. कदाचित ह्या घटनांचा ही परिणाम माझ्यावर झाला असेल आणि मग गेल्या दिवाळीपासून ही सिगरेट ओढण्याची सवय आणि तलफ एकदम संपलीच.

 

या सगळ्या दिवसांत बायकोची आणि मैत्रिणीची कुरकुर असायची - पण फार  नाही. माझा नातू मात्र  फारच कडकड  करायचा.  मी सिगरेट सोडली यावर त्याचा विश्वासच बसेना. आनंद झाला त्याला. म्हणाला आता हेच तू माझ्या बाबाला सांग - म्हणजे माझ्या मुलाला.  अर्थात माझा मुलगा काही फार सिगारेट ओढत नाही, जेमतेम एक-दोन कांड्या दिवसाला.

 

पण एकंदरीत माझ्या लक्षात आलंय की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमची जीवनशैली तुम्हाला झेपणारी हवी. त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून  मी  अतिशय  जाणीवपूर्वक  जीवनशैली मध्ये बदल करायचा प्रयत्न करीत आहे. याचा अर्थ प्रत्येकानेच आपले व्यसन सोडले पाहिजे असे नाही. आपल्याला जर  आवडत असेल आणि प्रकृतीला सोसत असेल तर कुठलेही व्यसन किंवा सवय चालू ठेवायला हरकत नाही. तेव्हा मित्रांनो मजा चालू ठेवा, एवढेच मी सांगेन!

 १३ ऑक्टोबर २०२१

स्वगत

नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते , अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी   परेराने आपल्या नाजूक आणि आर्...